आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
धर्मवीरगडाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या शौर्य, बलिदान आणि स्वराज्याच्या संघर्षाचा जिवंत पुरावा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात, भीमा नदीकाठी पेडगाव येथे हा भुईकोट किल्ला उभारला गेला. यादव काळात (१३वे शतक) देवगिरीच्या राजांनी या गडाचे बांधकाम केले. पुढे बहामनी, निजाम आणि मोगल अशा विविध सत्तांच्या ताब्यात तो गेला. औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश याने १६७२–७३ मध्ये गडाची डागडुजी करून त्याला ‘बहादूरगड’ हे नाव दिले आणि येथे आपली राजधानी स्थापन केली.
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा खर्च भागवण्यासाठी याच गडातील खजिना वसूल करण्यात आला. गडाचे व्यापारी महत्व ही मोठे होते. दक्षिणेतील सोन्या-चांदीचा व्यापार याच ठिकाणाहून चालायचा.
पण या गडाची सर्वात वेदनादायक आठवण म्हणजे १६८९ साल. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे छंदोगामात्य कवी कलश यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर याच गडावर औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आले. दिवाण-ए-आममध्ये त्यांचा तब्बल २६ दिवस अमानुष छळ करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य सोडण्यास नकार दिला आणि आपल्या स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. त्यामुळे हा गड मराठ्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अमर साक्षीदार ठरला. २००८ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ गडाचे नाव ‘धर्मवीरगड’ करण्यात आले.
आज धर्मवीरगड म्हणजे केवळ एक किल्ला नाही, तर मराठ्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा आणि स्वराज्याच्या लढ्याचा जिवंत पुरावा आहे. प्रत्येक वास्तू, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक अवशेष आपल्याला त्या काळात घेऊन जातो आणि छत्रपतींच्या अतुलनीय शौर्याची व धैर्याची आठवण करून देतो.
धर्मवीरगडाची रचना ही स्थापत्यशास्त्र, धार्मिक वारसा आणि जलव्यवस्थेतील प्रगत तंत्रज्ञान यांचा संगम आहे. पुण्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर पेडगाव गावाजवळ, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यात हा भुईकोट किल्ला उभारलेला आहे. आयताकृती आकाराचा हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे ५३० मीटर उंचीवर असून विस्तृत परिसरात पसरलेला आहे. गडावर प्रवेशासाठी आठ दरवाजे होते; गावाकडील दरवाजा आजही सुस्थितीत आहे, तर नदीकडील दरवाजा मोडकळीस आलेला आहे.
गडाच्या मुख्य वास्तूंमध्ये हमामखाना, राजदरबार, वेशी, तटबंदी, शौर्यस्तंभ आणि हत्ती मोट यांचा समावेश होतो. दिवाण-ए-खास ही दुमजली वास्तू असून तिच्या रचनेतून भीमा नदीच्या गारव्याचा अनुभव घेता येतो. हमामखान्यात आजही प्राचीन स्नानगृहाचे अवशेष दिसतात. सिंहासनाचा चौथरा हा १८६ × १५५ फूटाचा असून त्यावरून त्या काळातील सत्तेचा वैभव जाणवते.
धर्मवीरगडावर यादव काळातील हेमाडपंती शैलीतील सहा मंदिरे आहेत — बालेश्वर, लक्ष्मी-नारायण, मल्लिकार्जुन, रामेश्वर, पाताळेश्वर आणि भैरवनाथ. यांपैकी लक्ष्मी-नारायण मंदिर उत्कृष्ट शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी जून महिन्यातील किरणोत्सव हा स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना ठरतो.
गडावरील जलव्यवस्था ही विशेष उल्लेखनीय आहे. यादवकालीन हत्ती मोटीतून खापरी नळद्वारे संपूर्ण गडावर पाणी पोहोचवले जात असे. एअरव्हॉल्व प्रणालीचे अवशेषही येथे सापडतात (ही प्रणाली जलसिंचन किंवा पाणी पुरवठा पाईपलाईन मधील हवा बाहेर काढण्यासाठी व पाईपलाईनचे रक्षण करण्यासाठी वापरली जाते). बहादूरखानाने बांधलेली दुसरी मोट मशिदीस पाणीपुरवठा करण्यासाठी वापरली जात असे.
या सर्व रचनेतून धर्मवीरगडाचा वैभवशाली इतिहास आणि स्थापत्यकौशल्य स्पष्ट होते. गडावर फेरफटका मारताना प्रत्येक वास्तू, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक अवशेष आपल्याला इतिहासाची आठवण करून देतात.
धर्मवीरगडावरील स्वच्छता मोहीम ही केवळ स्वच्छतेचा उपक्रम नव्हता, तर ती एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पुनर्जागरणाची चळवळ ठरली.
13 एप्रिल 2025 रोजी सकाळपासूनच गडावर मावळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गडाच्या वेशीतून प्रवेश करताच स्वयंसेवकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्तंभासमोर नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर गडाच्या तटबंदी, वेशी, दिवाण-ए-खास, हमामखाना, सिंहासनाचा चौथरा, राणीमहाल आणि मंदिर परिसरात स्वच्छतेची कामे सुरू झाली.
लक्ष्मी-नारायण मंदिराभोवतीची झाडाझुडपे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचबरोबर बाळेश्वर, रामेश्वर, मल्लिकार्जुन आणि भैरवनाथ मंदिरांमध्येही स्वच्छतेची कामे झाली. मंदिरांच्या मूर्ती व सभोवतालचा परिसर पाण्याने धुऊन शुद्ध करण्यात आला, ज्यामुळे त्या प्राचीन वास्तूंचे तेज पुन्हा उजळून निघाले.
या मोहिमेत स्थानिक नागरिक, युवक, महिला आणि मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता. माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार राहुल जगताप आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके यांनी उपस्थित राहून स्वयंसेवकांना प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मोहिमेला अधिक औपचारिक आणि व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
मोहीमेचा उद्देश केवळ गडाची स्वच्छता नव्हता, तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण जागवणे, पर्यावरण रक्षण करणे आणि पुढील पिढ्यांपर्यंत स्वराज्याचा तेजस्वी वारसा पोहोचवणे हा होता.
१. ऐतिहासिक वास्तुचे जतन
२. स्वच्छता व पर्यावरण
३. पर्यटक सुविधा
४. सुरक्षा व व्यवस्थापन
५. रोजगार व स्थानिक सहभाग
संख्या नाही, बदल मोजतोय!